सावित्रीबाई जोतीराव फुले

सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील नायगावचे पाटील होते. तसेच त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाईना सिंधुजी, सखाराम आणि श्रीपती अशी तीन भावंडे होती. सावित्रीबाई लहानपणापासूनच धाडसी, हुशार आणि निर्भीड होत्या. तसेच त्या खेळात, पोहण्यात, नेमबाजीत देखील तरबेज होत्या. सावित्रीबाईना लहानपणापासून शिक्षणाचे आकर्षण होते. तत्कालीन समाजव्यवस्थेत स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यामुळे विविहापूर्वी त्यांना शिक्षणाची आवड असतानाही शिक्षण घेता आले नाही. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी विवाहाआधी दिलेले पुस्तक त्यांनी जपून ठेवले होते. व लग्नानंतर त्या सोबत घेऊन गेल्या होत्या. यावरून त्यांनी शिक्षणाची आवड, पुस्तकांवरील प्रेम दिसून येते.सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी 1840 मध्ये ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. यावेळी ज्योतीरावांचे वय देखील अवघे 13 वर्ष होतेसावित्रीबाईंना लग्नाआधीपासून शिक्षणाची आवड होती. त्यांना त्यांची आवड जपण्याची शिक्षण घेण्याची संधी लग्नानंतर मिळाली. त्यावेळी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय नसल्याने ज्योतीरावांनी त्यांना घरीच प्राथमिक शिक्षण दिले. त्यानंतर पुढील शिक्षण ज्योतीरावांचे मित्र सखाराम परांजपे आणि केशव भवळकर यांच्याकडून मिळाले. तसेच सावित्रीबाईंनी अहमदनगर आणि पुणे येथून अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले.

सुरुवातीला ज्योतीरावांनी पुण्यातील भिडे वाड्यात सुरु केलेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिक होत्या. यावेळी समाजातील धर्ममार्तंडानी सावित्राबाईंना ‘धर्मबुडवी’ घोषित करून येता जाता त्यांच्यावर शेणमाती फेकली. पण लहानपणापासून धाडसी असणाऱ्या सावित्रीबाई अशा घटनापासून विचलित न होता निर्भीडपणे आपले कार्य करीत राहिल्या. कालांतराने सावित्रीबाईंचा आदर्श घेऊन सगुणाबाई आणि फातिमा शेख या देखील त्यांच्यासोबत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. फुले दांपत्याने एकूण 18 शाळा सुरु केल्या होत्या. त्यांच्या शाळेत सर्व जातीधर्माच्या मुलामुलींना प्रवेश दिला जाई. तसेच त्यांनी 1856 मध्ये पहिले नेटिव्ह ग्रंथालय देखील सुरु केले होते

1897 च्या प्लेगच्या साथीत प्लेगच्या रुग्णांची जीवावर उदार होऊन सेवा केली होती पण हे करत असतानाच सावित्रीबाईना प्लेगची लागण झाली. यातच 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले. सावित्रीबाईंच्या निधनानंतरही त्यांची सत्यशोधक चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी अनेक स्त्रियांनी योगदान दिले. हीच सावित्रीबाईंच्या कार्याची फलश्रुती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *