एकदा एका सिंहाच्या पायात भला मोठा काटा घुसला. आपल्या दातांनी तो काढण्याचा प्रयत्न सिंहाने बराच वेळ केला; परंतु तो काटा निघाला नाही. लंगडत लंगडत तो एका मेंढपाळाकडे गेला. सिंह आपल्याजवळ येत आहे, हे पाहून तो मेंढपाळ खूप घाबरला. परंतु त्याला ठाऊक होते की तो जर पळून जायचा प्रयत्न करेल तर सिंह त्याला एका झेपेतच पकडेल. झाडावर चढून बसावे तर जवळपास झाडही नव्हते. दुसरा कोणताच उपाय नाही हे पाहून तो मेंढपाळ चुपचाप तेथेच बसून राहिला.
सिंहाने गर्जना केली नाही की तो गुरगुरला नाही. तो मेंढपाळासमोर येऊन बसला आणि त्याने आपला पाय त्याच्यापुढेकेला. सिंहाला आपली मदत हवी आहे हे त्या मेंढपाळाच्या लक्षात आले. त्याने सिंहाच्या पायातील काटा काढला. सिंह जसा आला होता तसाच तो जंगलाकडे निघून गेला.

काही दिवसांपूर्वी राजवाड्यात चोरी झाली होती. वैर आणि द्वेषामुळे काही लोकांनी राजाला मेंढपाळच चोर आहे, असे खोटेच सांगितले होते. ‘त्यानेच राजवाड्यात चोरी केली आहे.’ मेंढपाळाला पकडले. त्याच्या घरात चोरीची कोणतीही वस्तू मिळाली नाही. याने चोरीचा माल लपवून ठेवला आहे, असे राजाला वाटले. म्हणून राजाने “त्या मेंढपाळाला जिवंत सिंहाच्या तोंडी द्या.” अशी आज्ञा दिली.
योगायोगाने मेंढपाळाला मारण्यासाठी तोच सिंह पकडला गेला, ज्याच्या पायातील काटा त्याने काढला होता. जेव्हा त्या मेंढपाळाला सिंहासमोर सोडले तेव्हा त्या सिंहाने त्याला ओळखले. तो सिंह त्या मेंढपाळाजवळ येऊन बसला. तो कुत्र्यासारखा शेपूट हलवू लागला.
राजाला फार आश्चर्य वाटले. चौकशी केल्यानंतर परोपकारी मेंढपाळाशी सिंहाची कृतज्ञता त्याला समजून आली. राजाने मेंढपाळाला सोडून दिले.
तात्पर्य :- या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं की उपकार करणे आणि कृतज्ञता दाखवणे हे माणसाला अधिक श्रेष्ठ बनवतात.