एका छोट्या गावात मुकेश आणि राकेश नावाचे दोन जिवलग लहानपणीचे मित्र रहात होते. मुकेश हा शरीराने बारीक व राकेश हा थोडा जाड होता. एकदा ते दोघे दुसऱ्या मोठ्या गावात घोड्याची सवारी करायला जायला निघाले. त्यांनी आपसात असे ठरविले की, ‘प्रवासात जर एखादयावर काही संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करावी.’
वाटेत पुढे जाताना त्यांना एक मोठे जंगल लागते. तेव्हा त्यांच्यासमोर एक अस्वल येते व ते त्यांच्या अंगावर धावून येते. त्या दोन मित्रापैंकी मुकेश हा बारीक व चपळ असल्यामुळे जवळ असलेल्या झाडावर चढून बसतो. पण राकेश हा जाड असल्यामुळे त्याला पळणे शक्य नव्हते व झाडावर पण त्याला चढता येत नव्हते, तेव्हा तो आपला श्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन जमीनीवर पडतो. अस्वल त्याच्या जवळ येऊन त्याच्या कानाजवळ हुंगून बघतो आणि हे प्रेत आहे असे समजून त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून जातो.
अस्वल गेल्यावर झाडावर चढलेला मुकेश खाली उतरून आपल्या सोबतच्या मित्राला विचारतो ‘राकेश, त्या अस्वलाने तुझ्या कानात येऊन काय सांगितले?’ मुकेश उत्तरला ‘अस्वलाने मला सांगितले की, तुझ्यासारख्या लबाड मित्राच्या शब्दावर पुन्हा विश्वास ठेवू नकोस.’
तात्पर्य – खरा मित्र तोच जो संकटात सर्व काही विसरून धावून येतो.