“बलराम व कृष्ण हया दोघांच्या मुंजी करून त्यांना वसुदेवाने शिक्षणासाठी उज्जयिनीस सांदीपनी नावाच्या एका थोर गुरूंकडे पाठवले.
गुरूंकडे राहून त्यांनी दोघांनी वेदविद्या व शस्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले. त्यांची गुरूभक्ती, हुशारी व मेहनत पाहून गुरूजी संतुष्ट झाले. तेथे सहा महिने राहून बलराम व कृष्ण हे दोघेही विद्या संपादन करून परत आले. त्यांना पाहून सगळयांना खूप आनंद झाला.
कृष्णाला मारण्यासाठी कंसाचा सासरा जरासंध मथुरेवर चालून आला. परंतु कृष्णाने त्याचा पराभव केला.
त्यानंतर लवकरच विदर्भाचा राजा महान भीष्मक याची कन्या रूक्मिणी हिजबरोबर कृष्णाचं लग्न झाल. हे जरासंधाला आवडले नाही म्हणून त्याने परत मथुरेवर स्वारी केली. तेव्हा आपल्यामुळे मथुरेतील लोकांना त्रास होऊ नये म्हणून कृष्ण यादवांसह मथुरेतून बाहेर पडला.
त्याने समुद्रकिनारी व्दारका नावाचं एक नवीन नगर वसवल व तो तिथे सुखाने राज्य करू लागला.