कविकुलगुरू कालिदास

kalidas

भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्मिकींनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतला एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होता. कालिदासाला कविराज, कविकुलगुरू असे आदराने म्हटले जाते. त्याच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्याला हि उपमा बहाल केली आहे. आपल्याच क्षेत्रातल्या लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे लोक दुर्मिळ असतात.

दुर्दैवाने आपल्याकडे इतिहास चांगल्याप्रकारे लिहून ठेवण्याची परंपरा नव्हती. त्यामुळे असे महान लोक होऊन गेले तरी त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नसते. कालिदासाचेही असेच आहे. त्याने एकास वरचढ एक काव्ये आणि नाटक लिहिले असले तरी पद्धतशीर आत्मचरित्र लिहिले नाही. त्यामुळे त्याचा जन्म मृत्यू आणि आयुष्याचा घटनाक्रम आपल्याला नेमका माहित नाही.आणि असे असेल तर अनेक दंतकथा पसरतात तशाच कालिदासाबद्दल सुद्धा काही समज आहेत. त्याच्याच साहित्यातले वर्णन आणि मजकुराचा आधार घेऊन लोकांनी त्याचे जन्मस्थान, तो जास्त करून कुठे राहिला असेल याबद्दल अनेक अंदाज बांधले आहेत पण त्यात एकवाक्यता नाही. त्याचे नाव पण खरे तेच होते कि तो कालीचा भक्त असल्यामुळे त्याने ते नाव घेतले हे पक्के माहित नाही. बरेच लेखक आणि कवी आपल्या साहित्यकृतींवर काहीतरी वेगळे नाव लावतात.

त्याच्याविषयी एक लोकप्रिय दंतकथा अशी आहे. या कथेनुसार कालिदास खरं तर अजिबात विद्वान किंवा बुद्धिमान नव्हता. तो एक साधा मेंढपाळ होता. तो जिथे राहत होता त्या राज्यात राजाला एक सुंदर आणि बुद्धिमान राजकन्या होती. राजाच्या प्रधानाला असे वाटत होते कि आपल्या मुलाचे लग्न राजकुमारीशी व्हावे. त्याने राजासमोर तसा प्रस्ताव मांडला. राजाने तो धुडकावुन लावला. मला राजकुमारीसाठी “सकल विद्यासंपन्न” बुद्धिमान वर हवा आहे असे सांगितले. प्रधानाने हे मनाला लावुन घेतले. राजाने आपल्याला आणि आपल्या मुलाला मूर्ख ठरवले असे त्याला वाटले. त्याने याचा सूड घ्यायचे ठरवले. 

राजकुमारिला हवा त्याविरुद्ध असा कालिदास त्याने बघितला आणि त्याला पढवुन तयार केले. राजा आणि राजकुमारी काय बोलतील याचा अंदाज घेऊन चांगली उत्तरे द्यायला त्याला तयार केले.  चक्क कालिदास राजकुमारिला आवडला, आणि त्यांचे लग्न झाले. पण काही दिवसातच आपली फसवणुक झाली हे राजकुमारीला कळले आणि तिने कालिदासाचा फार अपमान केला. हा अपमान कालिदासाच्या जिव्हारी लागला आणि तो बदलला कालिदासाच्या काही कथांमध्ये हा अपमान लग्नाच्या आधीच झाला. लग्न झालेच नव्हते. अपमान झाल्यावर उद्विग्न होऊन तो निघुन गेला. 

 राजकुमाराने अपमान करून तिथुन निघुन गेल्यावर कालिदासाने शास्त्रे पुराणे वाचली, अभ्यास केला. देवीची साधना केली. देवीने त्याला प्रतिभा बहाल केली. त्याला हळुहळु लिहिण्याची इच्छा व्हायला लागली. त्याने मग सुंदर काव्ये लिहिली. त्याच्या काव्य आणि नाटकांमध्ये पुराणातल्या घटना छान रंगवुन फुलवुन सांगितल्या आहेत. तो राजकुमारीकडे परत आला तेव्हा तिने त्याला संस्कृतमध्ये विचारले “अस्ति कश्चित् वाग्विशेष?” याचा शब्दशः अर्थ असा कि आता तुझ्याकडे काही चांगलं विशेष (हुशारीचं) बोलण्यासारखं आहे का? म्हणजे तो अपमानित होऊन गेला आणि आता परत आला तर त्याने काही ज्ञान मिळवले कि तसाच परत आला आहे? तर उत्तरादाखल कालिदासाने ह्या वाक्यातले तिन्ही शब्द केले आणि एका एका शब्दापासुन सुरु होणारी कलाकृती निर्माण करून दाखवली. अस्ति या शब्दापासुन “कुमारसंभव” सुरु होते. कश्चीत या शब्दापासुन “मेघदूत” सुरु होते. आणि वाग्विशेष या शब्दापासुन “रघुवंश” सुरु होते.“कुमारसंभव” या काव्यात शंकर पार्वतीचा विवाह आणि कुमार कार्तिकेयाच्या जन्माची कथा आहे. “रघुवंश” मध्ये राम ज्या वंशात जन्मले त्या रघुवंशाची कथा आहे. हे दोन महाकाव्य म्हणजे आकाराने मोठे काव्य आहेत. 

मेघदूत हे कालिदासाच्या स्वतःच्या कल्पनेचा अविष्कार आहे. यात एक यक्ष आपल्या प्रिय पत्नीपासुन दुरावला असतो. त्याला बायकोची फार आठवण येत असते. तिच्याशी बोलावं वाटत असतं. पण तो तिच्यापासुन फार दूर असतो. मग तो समोर एका ढगाला विनंती करतो कि माझा संदेश तुच आकाशात फिरत फिरत माझ्या गावी जा आणि माझ्या प्रियेला दे. ढग म्हणजे मेघ. मेघाला दुत बनवले म्हणुन मेघदूत. मग तो ढगाला आपल्या मनातल्या भावना सांगतो. बायकोसाठी संदेश सांगतो. ढगाने कसे त्याच्या गावी जावे त्यासाठी रस्ता सांगतो. त्या रस्त्यातल्या जागांचे सुंदर वर्णन करतो. एवढी वेगळी आणि सुंदर कल्पना कालिदासच करू जाणे. 

कालिदासाने संस्कृत मध्ये नाटके सुद्धा लिहिली. “अभिज्ञान शाकुंतलम्” मध्ये ऋषिकन्या शकुंतला आणि राजा दुष्यंत यांची गोष्ट आहे. “मालविकाग्निमित्रम” हि मालविका आणि अंगमित्राची कथा, “विक्रमोर्वशियम” हे राजा पौरवस आणि उर्वशी यांची कथा असलेली नाटकेसुद्धा त्याने लिहिली आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *