एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली.
पटकऩ त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो कबुतरावर जाळे फेकणार एवढ्यात मुंगी फासेपारध्याच्या पायाला चावली.

त्यामुळे तो जोरात ओरडला. कबुतर त्यामुळे सावध झाले व फासेपारध्याला पाहून पळून गेले. अशा प्रकारे कबुतराच्या सत्कर्माचे फळ त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले.
कबुतर आणि मुंगी यांची गोष्ट आपल्याला सहकार्य आणि कृतज्ञता यांचे महत्व शिकवते. मुंगी पाण्यात बुडत असताना कबुतराने तिच्यावर दया दाखवून तिला वाचवले. हे केवळ एक मदतीचे उदाहरण नसून निस्वार्थपणाचे प्रतीक आहे.
पुढे, जेव्हा कबुतर स्वतः अडचणीत आले, तेव्हा त्याच मुंगीने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. या प्रसंगातून आपण हे शिकतो की जीवनात प्रत्येकाने एकमेकांना मदत केली पाहिजे.
आपण केलेले चांगले कर्म कधी ना कधी आपल्या मदतीला येते. त्यामुळे प्रत्येकाने दया, मदत आणि कृतज्ञता ही मूल्ये आत्मसात केली पाहिजेत.
तात्पर्य – संकटकाळी मदत करणारे हेच खरे मित्र.