श्री राम नवमी कथा (Shree Ram Navami Story)

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. याच दिवशी, त्रेतायुगात, अयोध्या नगरीचे राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूंचा सातवा अवतार, श्रीराम यांचा जन्म झाला.

राजा दशरथ यांना तीन पत्न्या होत्या – कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पुत्र नसल्यामुळे ते दुःखी होते. आपल्या गुरुंच्या सांगण्यावरून त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञात प्रसन्न झालेल्या अग्निदेवाने त्यांना तीन फळे दिली, जी त्यांनी आपल्या पत्न्यांना दिली.

कौशल्या राणी मोठी असली तरी, कैकेयी राजा दशरथांची प्रिय पत्नी होती. त्यामुळे कैकेयीने मोठे आणि सुंदर फळ स्वतःसाठी घेतले, तिला पराक्रमी पुत्र हवा होता. कौशल्या आणि सुमित्रा यांनी उरलेली फळे घेतली. पण अचानक एक घार आली आणि कैकेयीच्या हातातले फळ घेऊन गेली. (असे मानले जाते की याच फळामुळे हनुमानाचा जन्म झाला). तोपर्यंत कौशल्याने आपले फळ खाल्ले होते. कैकेयीला दुःखी पाहून सुमित्रेने मोठे मन करून आपले अर्धे फळ कैकेयीला दिले.

देवाच्या कृपेने तिन्ही राण्या गर्भवती झाल्या आणि त्यांना पराक्रमी पुत्र झाले. कौशल्याला सर्वात मोठे पुत्र झाले, त्याचे नाव राम ठेवले. कैकेयीच्या मुलाचे नाव भरत ठेवले आणि सुमित्रेला जुळी मुले झाली – लक्ष्मण आणि शत्रुघ्न.
या चारही भावांमध्ये खूप प्रेम होते, विशेषतः राम आणि लक्ष्मण, तसेच भरत आणि शत्रुघ्न यांच्यात घट्ट मैत्री होती. चौघेही पराक्रमी आणि गुणवान होते. श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूचे अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक असुर आणि राक्षसांचा नाश केला, ज्यात रावणाचाही समावेश होता.
चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी श्रीरामांच्या बालरूपाची पूजा केली जाते आणि त्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर भारतात बाळ रामाला ‘राम लल्ला’ म्हणून ओळखले जाते आणि त्यांची मूर्ती पाळण्यात ठेवून पूजा केली जाते.
रामाचा जन्म म्हणजे रामनवमी, रामाने रावणाला मारण्याचा दिवस म्हणजे दसरा, राम अयोध्येला परत आले तो दिवस दिवाळी आणि रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृती आणि लोकांच्या जीवनात या दिवसांचे खूप महत्त्व आहे.

रामनवमीचे महत्त्व

रामनवमी हा सण भगवान श्रीरामांच्या जन्माचे स्मरण करतो. हा दिवस सत्य, धर्म, निष्ठा आणि प्रतिष्ठेचा संदेश देतो. भगवान रामांचे जीवन आदर्श आणि नैतिक मूल्यांची शिकवण देते. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, रामचरितमानसचे पठण करतात, भजन-कीर्तन आणि रामायण कथांचे आयोजन करतात.
रामनवमीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि लोकांना धार्मिक आणि नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *