‘चांद्रयान-३’ हा आज आपल्या अभिमानाचा विषय आहे. ‘चांद्रयान-३’ या मोहिमेतून आपण काय साध्य केले आहे ते आपल्याला समजावून सांगत आहेत, पद्मश्री (१९९८), पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण (२००९) अशा तीन पद्म सन्मानांचे मानकरी असलेले नामवंत शास्त्रज्ञ आणि आपल्या मासिकाचे सल्लागार डॉ. अनिल काकोडकर!
‘चांद्रयान-३’च्या चंद्रावरील सफल अवतरणाने आपण सर्व भारतीय एक वेगळाच अभिमान अनुभवत आहोत. भारतीय अंतराळ वैज्ञानिकांनी चंद्रावरील ही स्वारी फत्ते करून दाखवली. आतापर्यंत चंद्राच्या ज्या भागात कोणीही पोहोचलेलं नाही, अशा ठिकाणी भारत पोहोचला. इतर देशांच्या तुलनेत भारताने अत्यंत कमी खर्चात हे साध्य केले आहे, हे या मोहिमेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य! बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीतसुद्धा या मोहिमेपेक्षा अधिक खर्च होत असतो. ‘चांद्रयान-३’ बद्दल बरीच माहिती इंटरनेट किंवा अन्य माध्यमातून उपलब्ध झालेली आहे.
अशा प्रकारच्या वैज्ञानिक मोहिमा आपण का आखतो व त्यातून काय साध्य करतो, हेही या निमित्ताने समजून घेऊ या. आपल्या सभोवतालचे जग जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असते. त्यासाठी मानवनेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे. गिर्यारोहण, आकाशात किंवा अवकाशात उंच भरारी, समुद्रतळाचे दर्शन आणि अशा नवख्या परिस्थितीचा अभ्यास, एकट्या-दुकट्याने छोट्या होड्यांतून केलेला लांब पल्ल्याचा प्रवास, अंटार्क्टिकावर बऱ्याच राष्ट्रांनी उभारलेली संशोधन केंद्रे व तेथे जाण्या-येण्यासाठी केलेल्या व्यवस्था अशा अनेक गोष्टी आपण मधूनमधून ऐकत असतो. नील आर्मस्ट्राँगने १९६९ मध्ये चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या गोष्टी आपण कुतूहलाने व कौतुकाने ऐकतो, वाचतो. अशा धाडसीप्रयत्नांत साहसाचा भाग तर महत्त्वाचाच, पण सहजासहजी अनुभवता न येणाऱ्या गोष्टी अनुभवणे, त्यांचा अभ्यास करणे व त्या अनुषंगाने मानवी ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे व गरजेचे आहे, असे मी मानतो.
तसे पाहिले तर आकाशात आपल्याला दिसणारे असंख्यतारे व त्यांचं परिभ्रमण याबद्दल सर्वांनाच मोठे कुतूहल असते. या विश्वाचीनिर्मिती कशी झाली असावी याबद्दल आपण निरीक्षणाद्वारे व सखोल अभ्यासाद्वारे अंदाजबांधतो. अधिक निरीक्षण आणि अभ्यासातून त्यांची सत्य-असत्यता सिद्ध करतो. हा प्रवास सतत चालू आहे. या क्षेत्रातीलआपल्या ज्ञानात खूप भर पडली आहे, मात्र अजून बऱ्याचगोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, हेही तितकेच खरे.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह. तारे, ग्रह आणि उपग्रह यांच्या निर्मितीचाअभ्यास करण्याच्या अनुषंगाने चंद्राच्या अभ्यासातून आपण बरेच काही शिकलो आहोत. तेथे प्रत्यक्ष जाऊन त्याची खातरजमाकरून घेणे आणि त्यातील बारकावे समजून घेणे, हे चंद्रावरील सर्वच स्वाऱ्यांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असणे स्वाभाविकच आहे. पृथ्वीप्रमाणे चंद्रावरही सर्वठिकाणी सारखी परिस्थिती नसते. ‘चांद्रयान-३’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरपहिल्यांदाच उतरले आहे, त्यामुळे त्या परिसरातील मोलाची माहिती सर्वप्रथम भारताने मिळवणे, हे या मोहिमेचे महत्त्वाचे यश म्हणायला हवे.
चंद्रावर दीर्घकाळ मानवी वास्तव्याच्या दृष्टीने पाण्याची उपलब्धता ही एकमहत्त्वाची गोष्ट. त्याअनुषंगाने भारताने आपल्या आधीच्या मोहिमेद्वारे सर्वप्रथम दक्षिण ध्रुव परिसरात पाणी असल्याचा शोध लावला होता. ‘चांद्रयान-३’ याबाबतीत अधिक प्रगती करू शकेल. मानवी प्रगतीस चालना देण्यासाठी लागणारी साधनसामग्री आपण वेगवेगळ्याखनिजांपासून प्राप्त करत असतो. चंद्रावर पृथ्वीपेक्षा वेगळ्या, पण खूप महत्त्वाची साधनसामग्री असण्याची शक्यताआहे. ऊर्जा-निर्मितीसाठी चंद्रावर हीलियम-३ आहे. इतरही अनेक गोष्टींसाठी चंद्र हा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. या साधनसामग्रींचा अचूक अंदाज व ती सामग्री पृथ्वीवर आणण्यासाठीलागणारे तंत्रज्ञान या सर्वांचा अभ्यास करणे आणि तंत्रज्ञानविकासासाठी लागणारी प्राथमिक माहिती गोळा करणे, ही देखील या मोहिमेची वैशिष्ट्येआहेत.
आज आपण चंद्रावरयान उतरवले. उद्या मानवाला तिथे उतरवण्याचाही विचार करता येईल. मानवाचे चंद्रावरील वास्तव्य किंवा चंद्रावरून अंतराळात दूरवर मोहिमा आखणे अशा गोष्टी शक्यहोतील का, याचा वेधघेणेही आवश्यक आहे. ‘चांद्रयान-३’ यादृष्टीने महत्त्वाची पहिली पायरी ठरावे. मानवाला पृथ्वीवर उपलब्धसाधन सामग्रींची टंचाई लवकरच जाणवू लागण्याची शक्यता आहे. अग्रेसर देशांच्या चंद्रावरील मोहिमांच्या चढाओढींमागे हेही एक मोठे कारण आहे. भारतासारख्या, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक षष्ठांश असा सर्वांत मोठा भाग असलेल्यादेशाला या स्पर्धेत मागे राहून कसे चालेल? आपले अंतराळ शास्त्रज्ञ यास्पर्धेत अग्रेसर राहून फार मोठी कामगिरी बजावत आहेत. त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. आपण त्यांना धन्यवाद देऊया!