बुडबुड  घागरी

तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे  मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले ‘मी आणतो साखर’. मांजर म्हणाले ‘मी आणते दूध’. उंदीर म्हणाला ‘मी आणतो शेवया’. तिघांनी पातेलेभर खीर केली. 

मग माकड म्हणाले ‘चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ’. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मांजर म्हणाली  तुम्ही जा मी खीर शिजवते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात.

मांजरीच्या तोंडाला पाणी सुटणे ती थोडी खीर खाते .तेवढी  खाऊन झाली पण तिला आणखी खावी वाटली.पुन्हा थोडी घेतली असे करत तिने सगळी खीर खाऊन टाकली . थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले ‘खीर कोणी खाल्ली?’ मांजर म्हणाले, ‘मला नाही माहीत.’ 

मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ‘ हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला ‘चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली.

मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ‘ म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी’. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.

तात्पर्य – नेहमी खरे बोलावे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *