एका गावात एक मेंढपाळाचा खोडकर मुलगा होता. 

तो नेहमी काही तरी खोड्या करत असे आणि लोकांना त्रास देत असे. लोक त्याची अनेकदा तक्रार करत. 

त्याला रोज आपल्या मेंढ्यांना चरायला नेऊन आणण्याचे काम असे. 

मेंढ्यांचे चरणे होईपर्यंत त्याला फार कंटाळा येत असे. 

एक दिवस त्याला कंटाळा घालवण्यासाठी एक विचित्र गंमतीची कल्पना सुचली. 

त्याने आरडाओरडा सुरु केला. “लांडगा आला रे आला. वाचवा. माझ्या मेंढ्यांना लांडगा खाईल. पळा पळा. लांडगा आला रे आला.”

गावातले लोक हातातले काम सोडुन त्याला मदत करायला पळत आले.  तो एका झाडावर बसुन हसत होता. “कसं उल्लु बनवलं. हाहाहा.” त्याची हि नवीन खोडी पाहुन लोक वैतागुन निघुन गेले. 

काही दिवसांनी त्याने परत तीच गंमत केली. यावेळी तरी खरं असेल असं समजुन पुन्हा लोक पळत आले. 

पुन्हा तो त्यांची मजा बघत हसत होता.  लोक अजुन चिडले आणि चरफडत परत निघुन गेले. 

काही दिवसांनी तो मेंढ्यांना घेऊन कुरणात गेलेला असताना मात्र खरंच लांडगा आला. 

लांडग्याने मेंढ्यांवर हल्ला केला.  आता मुलगा जिवाच्या आकांताने ओरडायला लागला. त्याच्या एकट्याकडून लांडग्याला हाकलने शक्य नव्हते.  कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. आता लोकांचा त्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता. लोक आपल्या जागेवरून हललेसुद्धा नाहीत. त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. 

मुलाच्या गंमतीसाठी मेंढ्यांचा जीव गेला.